२०१२ संपून २०१३चा प्रारंभ होत आहे. एकविसाव्या शतकातले हे पहिले तप होते. ते संपून दुस-या तपात प्रवेश करताना मनात उमटणारा प्रश्न असा की, आपण या तपभरात काय मिळवले आहे. याचे उत्तर शोधताना असे लक्षात येते की, जागतिक महासत्ता बनण्याचे स्वप्न बघणा-या आपल्या देशाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. यासाठी आजच्या तरुणांनी आपापल्या आवडीच्या क्षेत्रांत स्वत:ला गाडून तपश्चर्येला सुरुवात केली पाहिजे. नव्या वर्षात अन्य कुठलाही संकल्प न सोडता, आपण जे काही काम करतो, त्यात आम्ही निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. आम्ही आमच्या कामात चांगले प्रावीण्य, यश मिळवण्याचा निर्धार केला तरच भारताचे भवितव्य उज्ज्वल बनेल.
एकटया-दुकटया तरुणीची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, अपहरण आणि खून या प्रकारांना सध्या देशभरात अक्षरश: ऊत आला आहे. स्त्रीकडे बघण्याचा परंपरागत दृष्टिकोन हे याचे सगळ्यात मोठे कारण आहे. शिक्षणाने स्त्री समर्थ झाली तरी ती म्हणजे उपभोगाचे साधन, मूल देणारे यंत्र, फुकट राबणारी नोकर हाच संकुचित आणि अमानुष विचार आपल्या समाजाने वर्षानुवर्षे केला. त्यातून स्त्रीचे प्रत्येक टप्प्यावर शोषण झाले. आज महिलांवर अत्याचार करून गाजवला जाणारा ‘पुरुषार्थ’ याच बुरसट विचारसरणीचा परिपाक आहे. त्यामुळे स्त्रीत्वाचा अपमान करणा-या प्रवृत्तीचा नायनाट करायचा तर स्त्रीला देवीचा दर्जा देण्याची गरज नाही तर तिच्याशी समान पातळीवर नाते जोडायला हवे.
आपल्या कृषिप्रधान देशात शेती आणि पूरक व्यवसायासाठी मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाचे होते. एकत्र कुटुंबपद्धतीचा उगम त्या गरजेत होता. एकत्र कुटुंबपद्धतीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा, मार्गदर्शनाचा फायदा होत होता. म्हणून ज्येष्ठांच्या शब्दाला मान होता. स्वातंत्र्यानंतर देशातील शेतीवर आधारित ग्रामीण समाजव्यवस्था पूर्णपणे विस्कटली आणि शिकलेला प्रत्येक मुलगा शेती, कुटुंब आणि ग्रामीण जीवनापासून दूर गेला. वाढत्या नागरीकरणाने कुटुंबे ‘विभक्त’ केली. त्यामुळे आधी चौकोनी आणि हल्ली ‘त्रिकोणी कुटुंब’ म्हणजेच ‘फॅमिली’ असा समज दृढ झाला. या सगळ्या गडबडीत वृद्ध आई-वडिलांना, आपले कुटुंबातील स्थान हरवले आहे, याचा पत्ताच नसतो. त्यांना जेव्हा वास्तवाचे भान येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. आता तर भारतीयांचे सरासरी आयुष्य वाढतच चालले आहे. आयुष्याच्या उत्तरायणात जगणे सन्मानाचे नसले, तर त्याला ‘जगणे’ म्हणावे का?
आधुनिक पत्रकारितेला चटकदार गेयगतीच्या शीर्षकांची नव्याने ओळख करून देणारे आणि जाहिरातक्षेत्राला देखणी मराठी शब्दकळा बहाल करणारे वसंत सोपारकर आज आपल्यात नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य सोपारकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सो’ हे शब्दचित्रमय पुस्तक सादर केलंय. त्यानिमित्ताने वसंतकाकांना ही शब्दपुष्पांजली..
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आमचा देश भविष्यात आर्थिक महासत्ता होईल, अशी आशा लावून बसलेल्या मध्यमवर्गीयांचा आता अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्यांच्या बुद्धिमान पोरा-बाळांनी कधीच इंग्लंड-अमेरिकेची वाट धरलेली आहे. जे देशात उरलेत त्यांनी या देशात जे काही आहे, ते वाईट, त्याज्य आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. संख्येने कमी असणारा, जातीय आधार नसलेला हा वर्ग अल्पसंख्य आहे, म्हणून व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी तो नित्यनवे मार्ग शोधत असतो. कधी अण्णा हजारेंची टोपी चढवून मैदानात येतो, कधी रामदेवबाबांच्या इशा-यानुसार ‘आंदोलनासन’ करू लागतो. ‘हातचा खेळ’ असणाऱ्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करून हा भित्रा परंतु घातकी वर्ग समाजातील मान्यताप्राप्त व्यक्ती, प्रतीके आणि संस्थांचे भंजन करताना दिसतो. व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी हे याच अस्वस्थ, आत्ममग्न आणि उन्मत्त मध्यमवर्गाचे अपत्य आहे. गांधी-भगतसिंग यांच्याबद्दल या मध्यमवर्गाला अजिबात प्रेम नाही. परंतु त्यांचे नाव किंवा नाणे हातात घेतल्याशिवाय भारतात कुणालाच ‘किंमत’ मिळत नाही, हे हा लबाड मध्यमवर्ग ओळखून आहे. त्यामुळे असीमला अटक होण्याची वाट पाहणारा हा वर्ग तशी वेळ येताच चोहोदिशांनी एकत्र आला. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत सुटला. जणू काही स्वातंत्र्ययुद्धाची लढाई लढतो आहोत, अशा आवेशात पंचविशीतील असीम भाषण ठोकू लागला.. या एकंदर घटनेला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो, हे लक्षात येताच तमाम राजकारणी पोपटासारखे बोलू लागले. परिणामी असीमची भडकावू व्यंगचित्रे हा आपल्या देशासमोरचा राष्ट्रीय प्रश्न बनला.. त्यामुळे आर्थिक टंचाई, मंदी आणि गरिबीने गांजलेला आमचा देश, बौद्धिक दिवाळखोरीकडे जाताना दिसला. देशाचे हे ‘व्यंगचित्र’ बदलायला आता शिवबा राजांसारखा समाज शिल्पकार हवा आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन 119 वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकीय जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले होते. पण काळाच्या ओघात गणेशोत्सव बदलत, बदलत ‘गणेश फेस्टिव्हल’ झाला. उंच मूर्ती, भपकेबाज आरास आणि नवसाला पावणारा, अशी जाहिरात यामुळे सार्वजनिक गणपतींच्या दर्शनाला येणा-यांच्या रांगा वाढू लागल्या. अवघा गणेशोत्सव, नव्या अर्थकारणाच्या चक्राभोवती फिरू लागलाय. त्यामुळे त्याचा मूळ उद्देश हरवत चाललाय; पण सर्वसामान्य मराठी घरांमध्ये गणपतीच्या आगमनाची उत्सुकता, आतुरता अजूनही कायम आहे. कायम राहील. कारण आमचा गणपती हा ‘अंधेरी, लालबाग वा वांद्र्याचा राजा’ नाही, तो आहे अवघ्या विश्वाला व्यापून उरणारा ज्ञानेश्वरांच्या शब्दातील ओमकार स्वरूप विश्वनायक.. त्याचे लोककल्याणकारी कार्य पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
बालपणीचा काळ सुखाचा, ही म्हण आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर दिसत आहे, कारण बालपणातील बालसुलभ निरागसताच हरवत चालली आहे. पुण्याच्या ‘रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्टवर मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 750 ते 800 अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या वर्तनाने आपण ‘लहान’ राहिलो नसल्याचे जाहीर केले आहे. आठवी ते बारावी या अभ्यासाच्या, करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या इयत्तांमध्ये असणा-या या चांगल्या घरातील मुला-मुलींना अशा प्रकारची दारू-पार्टी करावीशी वाटणे, यातून आमचा मध्यमवर्गीय समाज कोणत्या स्तरापर्यंत घसरलेला आहे हे सिद्ध होते. मुख्य म्हणजे ‘विद्येचे माहेरघर’ समजल्या जाणा-या पुण्यामध्ये अशा प्रकारच्या ‘चिल्लर पार्ट्या’ ब-याच दिवसांपासून होत होत्या. यावेळी दिवट्याकार्ट्यांच्या पैशाच्या मागणीने वैतागलेल्या पालकांनीच थेट पोलिसांत तक्रार केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.. त्याची समाजाच्या सर्व स्तरांवर योग्य ती दखल घेतली गेली पाहिजे..
‘महाराष्ट्र’ या नावातच महानता दडलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रधर्म, छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले महाराज, शहाजीराजांनी शिकवला तेव्हापासून त्यातील महान तत्त्वांचा म-हाटमोळ्या लोकांना चांगलाच परिचय झाला आहे. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा। प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥’ हे महाराष्ट्र गीत लिहिताना म-हाटी मनांचा महाउद्गारच व्यक्त केला होता. त्या गीतामधील भाव आणि आशय आजही स्फूर्तिदायक वाटतो. ते लिहितात, ‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ तो महाराष्ट्र. ‘धर्म राजकारण एकसमवेत चालती’ तो महाराष्ट्र. आणि शेवटी ते म्हणतात, ‘सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो.. देह पडो सत्कारणी ही असे स्पृहा.. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. ‘ महाराष्ट्र धर्मा’चे असिधाराव्रत घेण्यासाठी ‘नवनिर्माणा’चा ध्यास घेतलेले राज ठाकरे पुढे येत आहेत. ‘महाराष्ट्रधर्मा’ला नव्या युगात नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याची ऐतिहासिक कामगिरी नियतीने त्यांच्यासमोर ठेवली आहे. ती ते किती गांभीर्याने घेतात हे येणारा काळच सिद्ध करेल.
सीएनएन-आयबीएन आणि हिस्टरी चॅनल तसेच ‘आऊटलुक’ साप्ताहिकातर्फे ‘गांधीजीनंतरचा सर्वश्रेष्ठ भारतीय कोण?’ अशी एक भली मोठी स्पर्धा घेतली गेली. लोकांना शंभर मान्यवर भारतीयांमधून एकाची निवड करण्यास सांगण्यात आले होते. त्यात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक मते मिळाली आणि त्यांना सर्वश्रेष्ठ भारतीय घोषित करण्यात आले. आम्हाला हा एकूण प्रकारच कोड्यात टाकणारा वाटतो, तरीही बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत विजयी होण्यासाठी मते न देणा-या भारतीयांनी आता त्यांच्या निर्वाणानंतर 61 वर्षानी ‘मत’ दिले, त्यांचे सर्वश्रेष्ठत्व मान्य केले याचा आनंदही आहे! महापुरुषांच्या ‘प्रतिमा’पूजनात रमलेल्या आम्ही भारतीयांनी त्यांच्या ‘प्रतिभा’साधनेचा पुरस्कार करणेही देशहितासाठी आवश्यक आहे.
‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...
आमच्यातील प्रत्येक जण प्रथम आपल्या कुटुंबाचा, मग जातीचा, काही वेळा प्रांताचा तर कधी धर्माचा विचार करत असतो. अगदी जाती-धर्माचा, प्रांत-भाषेच्या अभिमानासाठी कोणतीही ‘लढाई’ लढायला तयार असतो. पण मी भारतीय आहे, मला माझ्या देशाचा पर्यायाने माझ्या देशबांधवांचा विकास करायचा आहे, असे म्हणणारे आणि मानणारे फार कमी दिसतात, हे आमच्या स्वातंत्र्याचे सर्वात मोठे अपयश आहे. 65 वर्षापूर्वी आम्हाला स्वातंत्र्य मिळाले, पण ते स्वातंत्र्य कसले होते, ते आम्हाला अद्यापि समजलेले नाही.
पाणी आणि वीज या दोन्ही गोष्टी आजच्या युगात अत्यावश्यक बनल्या आहेत. त्यांच्या उपलब्धतेमुळे जगणे सहजसोपे झालेले दिसते. परंतु, त्याची कमतरता जगणे अशक्य करू शकते, याचा अनुभव आपण सारे घेत आहोत. दुष्काळाने देशातील 12 राज्यांना घेरले असतानाच सलग दोन दिवस 22 राज्यांनी काळोखाचा ‘अनुभव’ घेतला.. तोंडचे पाणी पळवणाऱ्या आणि डोळ्यांसमोर अंधार आणणा-या या समस्यांशी लढण्यासाठी सरकारआधी आपणच सा-यांनी कंबर कसली पाहिजे.
‘युवा’ हा शब्द उलट लिहिला की ‘वायू’ हा शब्द तयार होतो. विशेष म्हणजे, दोन्ही शब्दांमधून सारखाच अर्थ ध्वनित होतो. शक्ती, सामर्थ्य, चपळाई आणि नवनवोन्मेषशालि प्रतिभा म्हणजे तरुणाई. हे लखलखते तारुण्य आज अवघ्या भारतवर्षाला लाभले आहे. भारताचे आजचे सरासरी वय 25 आहे. पुढील 10 वर्षात या तरुणाईतून 40 कोटी बुद्धिमान तरुणांची फौज जगभरातील महत्त्वाच्या पदांवर आरूढ झालेली दिसेल, असे भाकीत ‘द इकॉनॉमिस्ट’ या अत्यंत प्रतिष्ठित साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. अवघ्या जगाला भारताच्या या सुप्तशक्तीची जाणीव झाली आहे. अशा वेळी भारताचे नेतृत्व एका सुजाण, संयमी आणि सुसंस्कृत तरुणाकडे गेले पाहिजे. त्या तरुणाकडे सगळे जग ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर’ म्हणून पाहत असेल; परंतु सद्य:स्थितीतील भारताचे राजकारण पाहता, हा गांधी घराण्याचा वारसदार पंतप्रधानपदाचा सगळ्यात योग्य उमेदवार आहे...
शंभरी गाठलेल्या हिंदी सिनेमाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली. आरंभी तो पुराणांमध्ये रमला कारण तत्कालिन भारतीय समाजालाही पौराणिक चमत्कृतीचे आकर्षण होते. स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी सिनेमाचे सामाजिक भान जागे झाले. त्यानंतर दर आठ-दहा वर्षानी हिंदी सिनेमा कात टाकून नवा अवतार धारण करताना दिसत गेला. आजही ही बदलाची प्रक्रिया सुरू आहे. या बदलत्या रूपातील हिंदी सिनेमाने सामाजिक वास्तव कधी नव्हे एवढय़ा प्रमाणात स्वीकारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विवाहबाह्य संबंध, समलिंगी संबंध, जबरदस्त हिंसाचार अशा एक ना अनेक नको वाटणा-या गोष्टी समाजातून सिनेमात झिरपत आहेत. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या काळातील सिनेमा आणि आजचे चित्रपट यांची तुलनाच करता येत नाही. काळ बदलला, कायदे बदलले, जगण्याचे वायदे बदलले. हिंदी चित्रपटांची लोकप्रियता मात्र कायम तशीच राहिली. कारण सिनेमा हे भारतीयांच्या जगण्याचे प्रतिबिंब मानले जाते.. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जाण्याने रूपेरी पडद्यावरील हे आभासी वास्तव हलले..
‘स्वप्नवासवदत्ता’ हे भासाने सुमारे दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेले नाटक आजही अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातील ‘कालक्रमेण जगत, परिवर्तमाना:’ हे वासवदत्ताच्या तोंडचे वाक्य तर ‘कालानुसार जगात परिवर्तन होत जाते’ या त्रिकालाबाधित सत्याचा उत्कट आविष्कार मानला जातो. सध्या काळ म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला ‘टाइम’ म्हटले जाते, तेच शीर्षक असणाऱ्या मासिकाला वासवदत्ताच्या वाक्याची वारंवार आठवण येत असावी आणि त्या उर्मीतूनच ‘टाइम’च्या पत्रकार क्रिस्ता महर यांनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे ‘अंडरअचिव्हर’ आहेत. त्यांना त्यांचे काम चोखपणे करता येत नाही, असा शोध लावला असावा. ज्या ‘टाइम’ने मनमोहन सिंग यांना जगातील पहिल्या 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये समाविष्ट केले होते. त्याच साप्ताहिकाने अवघ्या दोन वर्षात डॉ. सिंग यांना ‘कुचकामी राज्यकर्ता’ म्हणून घोषित करावे आणि ‘टाइम’ने फार मोठा शोध लावला आहे, तेव्हा आपण त्याचे समर्थन केलेच पाहिजे म्हणून भाजप-शिवसेनेने ‘टाइम’ची तळी उचलायची, या सगळ्या घटनाक्रमात एक सुसंगती आहे. ती सगळी सुसंगती लावताना एका संघटीत यंत्रणेच्या हालचालींचा अंदाज येतो.. ‘टाइम’चा लेख अगदी ‘वेळेवर’ प्रसिद्ध होणे, ही या हालचालींची नांदी आहे. आपल्याला अमेरिकेतील हे साप्ताहिक फार प्रतिष्ठित वगैरे वाटत असेल; पण ते यावेळी ‘वेड पांघरून, पेड न्यूजवाले’ झाले आहे..
‘कुणब्याच्या जन्मा जाशी तर पेरू-पेरू मरशी, वाघाच्या जन्मा जाशी तर तोलू-तोलू मरशी पन् काथोड्याच्या जन्मा जाशी तर जंगलचा राजा होशी’ अशी एक म्हण कातकरी जमातीत प्रचलित होती. तसे पाहायला गेल्यास सर्वच आदिवासी जमातींना आपल्या जंगलावरच्या स्वामित्वाबद्दल अभिमान असतो; परंतु इंग्रजांच्या आगमनापासून आदिवासींना जंगलातून हुसकावून लावण्यात आले आणि त्यांच्या जगण्याचा आधारच तुटला. 1861 मध्ये ब्रिटिश लॉ अॅण्ड रेव्हेन्यू सुपरिटेंडेंड वेडन-पॉवेल याने सर्वप्रथम देशात वन कायदा लागू केला, लेखणीच्या एका फटका-यानिशी त्याने भारतातील सर्व जमीन व जंगले इंग्रजांच्या मालकीची केली. त्याचा सगळ्यात जास्त फटका आदिवासींना बसला. जंगलातील फळे-फुले, कंदमुळे आणि शिकार यावर जगणारा आदिवासी त्याच्याच जंगलात उपरा ठरला. आजही परिस्थिती बदललेली नाही. त्यामुळे परवा केंद्रीय आदिवासी विकासमंत्री व्ही. किशोरचंद्र देव यांनी महाराष्ट्रासह 17 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘वनहक्क कायद्या’ची अमलबजावणी करताना आदिवासी जमातींची पुरेशी काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. आता तरी शासकीय यंत्रणांनी आणि आदिवासींच्या नावावर मोठ्या झालेल्या राजकारण्यांनी आणि तथाकथित समाजसेवकांनी आदिवासी विकासाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू करावेत. अन्यथा भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत!
आपल्या जनतेचे जगणे आनंदमयी आणि आरोग्यदायी करणे हे सरकारचे पहिले कर्तव्य आहे. त्याचबरोबर आपला परिसर आणि पर्यायाने देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. भारताच्या दुर्दैवाने सरकारी पातळीवर स्वच्छतेच्या विषयाकडे लक्ष दिले जात नाही आणि आम्हा भारतीयांना तर स्वत:च्या घरापलीकडे स्वच्छतेचा विचार करण्याची सवय झालेली नाही. परिणामी अस्वच्छ वातावरणामुळे आमच्या एकूणच जगण्याचा स्तर खाली आला आहे. ‘असेल जिथे स्वच्छता- तिथे वसे देवता’ असे म्हणतात; परंतु आमचे रस्ते, बस वा रेल्वे स्थानक, गल्ल्या, सरकारी कार्यालये, कुठेही जा, तुम्हाला गलिच्छ, ओंगळवाणे दृश्य दिसणारच. कच-यांचे ढीग, घोंघावणा-या माशा, डास हे जणू आमच्या जगण्याचे अविभाज्य घटक झाले आहेत.. अकाली उद्भवणा-या साथीच्या रोगांचे उगमही या घाणीतच दडलेले असतात. हे सगळे ठाऊक असूनही आम्ही सुधारायला तयार नाही.. बदलत्या जगाबरोबर पुढे जायला तयार नाही.. शाळेत आम्ही ‘नागरिकशास्त्र’ शिकलो, पण जगलो नाही!
भाजपाची निर्मिती रा. स्व. संघाच्या जहाल हिंदुत्ववादी विचारातून झाली आहे, कम्युनिस्ट पक्षाच्या विविध गटांनी मार्क्स, लेनिन आणि माओच्या नावाने आपली दुकाने थाटली आहेत. राम मनोहर लोहिया यांच्या स्वप्नातील वर्गविहीन समाज निर्मितीचा प्रयत्न करणाऱ्या समाजवादी विचारसरणीचे तीन-तेरा वाजले आहेत. लालूप्रसाद यादव, नीतीशकुमार, उत्तरप्रदेशचे मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान आणि शरद यादव प्रभृतींनी समाजवादातील ‘स’ खोडून उत्तर भारतात ‘माजवाद्यां’ची दहशत निर्माण केलेली दिसते. या अशा कचकडय़ा विरोधकांकडून काँग्रेसच्या महाशक्तीला आव्हान दिले जाणे कल्पनेतही शक्य दिसत नाही. त्यातल्या त्यात भाजपाची गेल्या दहा वर्षांत झालेली घसरण तर लोकशाहीप्रेमींना चिंता वाटावी एवढी भयानक आहे.
यंदा आपल्या देशात तब्बल 25 कोटी टन इतके धान्य उत्पादन झाले आहे. शासकीय गोदामे अक्षरश: धान्याने ओसंडून वाहत आहेत. तरीही भारतात दररोज 7 हजार लोक उपासमारीने मरतात, ही वस्तुस्थिती मन अस्वस्थ करते. देशातील 11 कोटी टन धान्य पाऊसपाण्याने सडते, खराब होते, उंदरांच्या पोटात जाते; पण देशातील 23 कोटी लोक रोज उपाशीपोटी झोपतात. भाकरीचा चंद्र शोधण्यात त्यांची हयात जाते.. भारत सरकारने ‘चांद्रयान’ मोहिमेची घोषणा केली त्या वेळी आपल्या सर्वाना किती आनंद झाला होता; पण तसे पाहिले तर चंद्रावर पोचण्यासाठी यानाची गरज काय? अन्न महामंडळाच्या गोदामात वर्षानुवर्षे पडून असलेल्या धान्याच्या पोत्यांचा एकावर एक असा थर रचला तर माणूस सहज चंद्रापर्यंत पोहचेल.. आणि हो, त्या माणसाला उतरण्यासाठीही पोत्यांची रास रचता येईल, एवढे मुबलक धान्य आपल्याकडे पडलेले आहे.. ते सडते आहे. आपल्या रोगट आणि कुबट प्रशासनाला मात्र अद्याप जाग येत नाही. रोमन तत्त्वज्ञ सेनेका यांनी सांगून ठेवले आहे, ‘भूकेली जनता सबबी ऐकत नाही, कायद्याची पर्वा करत नाही आणि प्रार्थनांना जुमानत नाही.’
युगे अठ्ठावीस वीटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे अराध्यदैवत आहे. आषाढी-कार्तिकीची वारी हा मराठीजनांचा कुळाचार आहे. दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय आणि नियंत्रणाशिवाय वारीचा सोहळा साजरा होतो. सातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझे जीवीची आवढी। पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलींनी प्रगट केलेली ती इच्छा आजही चढत्या-वाढत्या उत्साहानं लक्षावधी वारकरी पूर्ण करत असतात. आज आणि उद्या ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करतील..‘ज्या देशाचे लोक पंढरपूरच्या वारीला जातात, त्या देशाला महाराष्ट्र म्हणतात’, अशी एक महाराष्ट्राची व्याख्या मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी केली आहे. त्या प्रत्यक्ष अनुभवलेल्या वारीविषयी..
वाढत्या लोकसंख्येला अन्न, पाणी आणि निवारा देणे ही कल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्राथमिक जबाबदारी असते. निसर्गाच्या प्रकोपाने, अस्मानी आपत्तीने जेव्हा सामान्य लोक होरपळून जातात, त्यावेळी शासन नावाची व्यवस्था त्यांच्या मदतीला धावते. जेव्हा शासन अस्तित्वात नव्हते, त्यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज वा दामाजीपंतासारखे महापुरुष लोकांच्या उपयोगी पडले. पुढे छत्रपती शाहू महाराज, बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड या ‘लोकांच्या राजां’नी लोकोपयोगी कामे करून निसर्गाच्या आक्रमणाला थोपवून धरले होते. आज पुन्हा अवर्षण- पाणी टंचाईच्या गर्तेत महाराष्ट्र सापडला आहे. शेतातील पिकांवर, गोठ्यातील गुरांवर आणि तारातील भाकरीवर अवर्षणाची अवकृपा झाल्याने खेड्यापाड्यातील म-हाटमोळी जनता हवालदिल झाली आहे. ज्या गावात पाणीटंचाई असते, भारनियमन असते, त्या गावातल्या मुलांशी लग्न करायला मुली तयार नाहीत, सरकारी कर्मचा-यांना तिकडे बदली नको असते. आपल्या वयस्कर आई-वडिलांना सोडून दरवर्षी हजारो बेकार शहराकडे धाव घेताना दिसतात. हे सामाजिक वास्तव मन अस्वस्थ करणारे आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून सहा दशके उटलली, तरी शिक्षणासारख्या मूलभूत क्षेत्रात आम्ही आमूलाग्र बदल केलेले नाहीत. इंग्रजांनी आपला राज्यकारभार सुरळीत चालावा यासाठी कारकूननिर्मितीचा अभ्यासक्रम आणला होता. दहावी, बारावी आणि नंतर पदवी हा ‘मेकॉले पॅटर्न’ आजही त्याच पद्धतीने सुरू आहे. ज्याप्रमाणे बोराच्या झाडाला आंबे लागू शकत नाहीत, त्याप्रमाणेच कारकून तयार करण्याच्या ‘फॅक्टरी’मध्ये संशोधक विचारवंत, कलावंत तयार होणे अशक्य. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी विद्येच्या उपासनेत रमणा-या, संशोधनासाठी झोकून देणा-या आणि ज्ञानप्राप्तीसाठी अन्य सगळ्या प्रलोभनांकडे पाठ फिरवणा-या ज्ञानी, प्रतिभावंतांची गरज असते. प्रतिभावान लोकांची शाळा-महाविद्यालयांतून जडणघडण होते, त्यामुळे ज्या देशात अशा उत्तम शैक्षणिक संस्था असतात ते देश सर्वच क्षेत्रात प्रगती करतात. युरोप-अमेरिका असो वा आपल्या मागून पुढे चाललेला चीन, या सगळ्या देशांनी पद्धतशीरपणे शिक्षणाची कास धरली म्हणून त्यांचा अवघा समाज सुधारला. पाश्चात्यांच्या फॅशन्सचे, व्यसनांचे अनुकरण करणा-या आम्हा भारतीयांनी त्यांची ज्ञानोपासना, कामावरची निष्ठा आणि तत्त्वासाठी प्राण देण्याची तयारी या त्रिसूत्रीचे अनुकरण केले तर.. भारत नक्कीच महासत्ता बनेल!
माणूस असो वा राष्ट्र, ऊर्जेशिवाय या जगात कोणाचीच प्रगती होत नाही. आज आपल्या राज्यात, देशात वीजटंचाईने कहर माजवला आहे. ती टंचाई दूर करण्यासाठी अणुऊर्जेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सिद्ध होत आहे. एकेकाळी विनाशाचे प्रतीक बनलेली अणुभट्टी जर विकासाला जन्म देणार असेल, तर भारतासारख्या देशाने या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेने आपल्यासमोर स्वस्त आणि स्वच्छ वीजनिर्मितीचा पर्याय खुला करून र्सवकष विकास दृष्टिपथात आणला आहे. या आधी जगात युद्धाला, अणुबॉम्बला विरोध करणा-या संघटना दिसत. हल्ली त्याच स्टाईलने काही सुपारीबाज संस्था-संघटना परकीय एजंटांकडून लाच घेऊन जैतापूर वा कुडानकलमला विरोध करताना दिसतात. ही गोष्ट संतापजनक आहे. या प्रवृत्तींना वेळीच लोकांनी रोखले पाहिजे, तरच विकासाची गंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल..