Mahesh Mhatre

आधुनिक पत्रकारितेला चटकदार गेयगतीच्या शीर्षकांची नव्याने ओळख करून देणारे आणि जाहिरातक्षेत्राला देखणी मराठी शब्दकळा बहाल करणारे वसंत सोपारकर आज आपल्यात नाहीत. त्यांचे चिरंजीव आदित्य सोपारकर यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘सो’ हे शब्दचित्रमय पुस्तक सादर केलंय. त्यानिमित्ताने वसंतकाकांना ही शब्दपुष्पांजली..
Read More …

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखला जाणारा आमचा देश भविष्यात आर्थिक महासत्ता होईल, अशी आशा लावून बसलेल्या मध्यमवर्गीयांचा आता अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्यांच्या बुद्धिमान पोरा-बाळांनी कधीच इंग्लंड-अमेरिकेची वाट धरलेली आहे. जे देशात उरलेत त्यांनी या देशात जे काही आहे, ते वाईट, त्याज्य आहे, अशी भूमिका घेतलेली आहे. संख्येने कमी असणारा, जातीय आधार नसलेला हा वर्ग अल्पसंख्य आहे, म्हणून व्यवस्थेवर हल्ला करण्यासाठी तो नित्यनवे मार्ग शोधत असतो. कधी अण्णा हजारेंची टोपी चढवून मैदानात येतो, कधी रामदेवबाबांच्या इशा-यानुसार ‘आंदोलनासन’ करू लागतो. ‘हातचा खेळ’ असणाऱ्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करून हा भित्रा परंतु घातकी वर्ग समाजातील मान्यताप्राप्त व्यक्ती, प्रतीके आणि संस्थांचे भंजन करताना दिसतो. व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी हे याच अस्वस्थ, आत्ममग्न आणि उन्मत्त मध्यमवर्गाचे अपत्य आहे. गांधी-भगतसिंग यांच्याबद्दल या मध्यमवर्गाला अजिबात प्रेम नाही. परंतु त्यांचे नाव किंवा नाणे हातात घेतल्याशिवाय भारतात कुणालाच ‘किंमत’ मिळत नाही, हे हा लबाड मध्यमवर्ग ओळखून आहे. त्यामुळे असीमला अटक होण्याची वाट पाहणारा हा वर्ग तशी वेळ येताच चोहोदिशांनी एकत्र आला. ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देत सुटला. जणू काही स्वातंत्र्ययुद्धाची लढाई लढतो आहोत, अशा आवेशात पंचविशीतील असीम भाषण ठोकू लागला.. या एकंदर घटनेला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो, हे लक्षात येताच तमाम राजकारणी पोपटासारखे बोलू लागले. परिणामी असीमची भडकावू व्यंगचित्रे हा आपल्या देशासमोरचा राष्ट्रीय प्रश्न बनला.. त्यामुळे आर्थिक टंचाई, मंदी आणि गरिबीने गांजलेला आमचा देश, बौद्धिक दिवाळखोरीकडे जाताना दिसला. देशाचे हे ‘व्यंगचित्र’ बदलायला आता शिवबा राजांसारखा समाज शिल्पकार हवा आहे.
Read More …

सार्वजनिक गणेशोत्सव सुरू होऊन 119 वर्षे उलटली आहेत. महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकीय जागृती आणि राष्ट्रीय भावना निर्माण व्हावी, या हेतूने लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले होते. पण काळाच्या ओघात गणेशोत्सव बदलत, बदलत ‘गणेश फेस्टिव्हल’ झाला. उंच मूर्ती, भपकेबाज आरास आणि नवसाला पावणारा, अशी जाहिरात यामुळे सार्वजनिक गणपतींच्या दर्शनाला येणा-यांच्या रांगा वाढू लागल्या. अवघा गणेशोत्सव, नव्या अर्थकारणाच्या चक्राभोवती फिरू लागलाय. त्यामुळे त्याचा मूळ उद्देश हरवत चाललाय; पण सर्वसामान्य मराठी घरांमध्ये गणपतीच्या आगमनाची उत्सुकता, आतुरता अजूनही कायम आहे. कायम राहील. कारण आमचा गणपती हा ‘अंधेरी, लालबाग वा वांद्र्याचा राजा’ नाही, तो आहे अवघ्या विश्वाला व्यापून उरणारा ज्ञानेश्वरांच्या शब्दातील ओमकार स्वरूप विश्वनायक.. त्याचे लोककल्याणकारी कार्य पुन्हा एकदा नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे.
Read More …

बालपणीचा काळ सुखाचा, ही म्हण आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर दिसत आहे, कारण बालपणातील बालसुलभ निरागसताच हरवत चालली आहे. पुण्याच्या ‘रिव्हर व्ह्यू’ रिसॉर्टवर मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 750 ते 800 अल्पवयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या वर्तनाने आपण ‘लहान’ राहिलो नसल्याचे जाहीर केले आहे. आठवी ते बारावी या अभ्यासाच्या, करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या इयत्तांमध्ये असणा-या या चांगल्या घरातील मुला-मुलींना अशा प्रकारची दारू-पार्टी करावीशी वाटणे, यातून आमचा मध्यमवर्गीय समाज कोणत्या स्तरापर्यंत घसरलेला आहे हे सिद्ध होते. मुख्य म्हणजे ‘विद्येचे माहेरघर’ समजल्या जाणा-या पुण्यामध्ये अशा प्रकारच्या ‘चिल्लर पार्ट्या’ ब-याच दिवसांपासून होत होत्या. यावेळी दिवट्याकार्ट्यांच्या पैशाच्या मागणीने वैतागलेल्या पालकांनीच थेट पोलिसांत तक्रार केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.. त्याची समाजाच्या सर्व स्तरांवर योग्य ती दखल घेतली गेली पाहिजे..
Read More …