Mahesh Mhatre

समाज म्हणजे तरी काय, बटाटयाचे पोते. विविध आकारांच्या माणसांना रितीरिवाजाच्या, नीतिबंधनाच्या पोत्यात भरलेले असते, म्हणून एकसंधपणे ‘उभा’ असणारा समाज बरा दिसतो. पण जेव्हा नीतिमत्तेची, संस्कृतीबंधाची शिवण सैल होते, त्या वेळी पोत्यातील बटाटे खाली घसरू लागतात. ही ‘घसरण’ साथीच्या रोगासारखी सगळयाच बटाटयांमध्ये पसरण्याचा धोका असतो. त्यासाठी वेळीच त्या पोत्याची शिवण विचारपूर्ण मनाने करणे जरुरीचे असते. ते झाले नाही तर अस्ताव्यस्त होण्यासाठी, स्वत:ला नासवण्यासाठी आतुर असलेले बटाटे एकामागोमाग एक खराब होत जातात. त्यातून समाजाच्या उच्चस्थानावर असणारे ‘बटाटे’सुद्धा सुटत नाहीत. परिणामी त्यांच्या दरुगधीने सारा परिसर भरून जातो.. 

कुठे भ्रष्टाचार, कुठे महिलांवरील अत्याचार, कुठे मन अस्वस्थ करणारा अनाचार तर कुठे विचारवंतांचा वेडाचार.. सगळीकडे दरुगधीच दरुगधी..आणि म्हणूनच ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्या इशा-याची प्रकर्षाने आठवण येते. ‘आधी समाजसुधारणा करू, मग लोकांना राजकीय स्वातंत्र्यासाठी सिद्ध करू’ असे आगरकर कळकळीने सांगत होते, पण लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. संतापलेल्या सनातनी पुणेकरांनी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती, पण तरीही आगरकरांनी आपला ‘सुधारकी’ बाणा सोडला नाही. आपणही तो स्वीकारला पाहिजे. १७ जून ही आगरकरांची पुण्यतिथी महाराष्ट्रात फार कमी लोकांच्या लक्षात राहते. यावेळी आपण ती आगरकर विचार स्मरणाने साजरी केली तरी नव्या बदलाची सुरुवात होईल.
Read More …

मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या किंवा अपात्रतेच्या मुद्दयावरून मोदी सरकार अडचणीत आलेले दिसते. भारतीय विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाशी संबंधित ध्येयधोरणे ठरविणारा हा विभाग देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या खात्याच्या मंत्र्याच्या विचार-वर्तनाकडे सा-या समाजाचे लक्ष असते. सध्या भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी पंचविशीखालील तरुणांची संख्याच पन्नास टक्के म्हणजे ६० कोटींहून अधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर या खात्यात होणा-या निर्णयांचे परिणाम जास्त तीव्र ठरतील. तसे पाहिले तर सध्या १७ ते २४ वयोगटांतील विद्यालय- विद्यापीठात शिकणा-या विद्यार्थ्यांचे प्रमाण फक्त १० ते १४ टक्के आहे. त्याउलट इंग्लंड-अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये तेच प्रमाण ४० टक्क्यांच्या आसपास पाहायला मिळते. मोदी सरकारने या वाया जाणा-या मनुष्यबळाला शिक्षण वा प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या द्रष्टया नेतृत्वातून आपल्याकडील उच्चशिक्षणाला नवनवे आयाम लाभले होते. पण स्वार्थी मध्यमवर्गाने सरकारी पैशातून शिक्षण घेऊन परदेशांची चाकरी करण्यात धन्यता मानली. परिणामी नेहरूंच्या सर्वागीण विकासाच्या कल्पनांची भरारी घेण्याआधी पिसं निघालेली दिसली. ज्या अभिजन आणि उच्चभ्रू वर्गातील पोराटोरांनी आयआयटी, आयआयएम किंवा एमबीबीएससारख्या पदव्या करदात्यांच्या करोडो रुपयांतून मिळवल्या आणि देशहिताला टांग मारून जे अनिवासी भारतीय झाले, ते आणि त्यांच्याच जातकुळीतील उच्चभ्रू वर्गाला मोदी सरकार हवे होते. तसे झालेही. हा नेहरूकृपेने शिकलेला, मनमोहनकृपेने सुखवस्तू बनलेला वर्ग आता मोदीकृपेने अधिक धनाढय़ होण्याची स्वप्ने पाहतोय. मात्र त्यातही त्यांचा ‘स्टेटस’चा मुद्दा पुढे येतोच. भाजपला मानणा-या प्रा. मधु किश्वर यांच्यासारख्या ‘घरातल्याच’ मंडळींनी इराणीबाईंच्या शिक्षणाचा विषय छेडला आणि गोंधळ निर्माण केला आहे. नजीकच्या भविष्यात हाच वर्ग मोदी सरकारला तापदायक ठरण्याची शक्यता आहे. या उच्चभ्रू वर्गात पूर्वी शिकलेला जावई असणे मानाचे समजले जायचे. हल्ली त्यांना सूनसुद्धा चांगली शिकलेलीच हवी असते. कदाचित त्यामुळेच एकेकाळी ‘बहू’ म्हणून गाजलेल्या स्मृतीजींना ‘कमी शिकलेली सून’ म्हणून अनेकांचा ‘नकार’ मिळत असावा.
Read More …

गंगा नदी ही तमाम भारतीयांसाठी केवळ जीवनदायिनी नाही, तर ती पापनाशिनीसुद्धा आहे. म्हणून असेल कदाचित वाराणसी मतदारसंघात पाऊल ठेवण्याआधीपासून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचलेले नरेंद्र मोदी यांनी गंगास्तुती सुरू केली होती. गंगा स्वच्छतेचा आणि वाराणसीच्या सर्वकष विकासाचा आराखडा घेऊन ते निवडणुकीला सामोरे गेले आणि विजयी झाले. आता गंगा सफाईचे अभियान मोदी किती गांभीर्याने आणि समर्थपणे पुढे नेतात, यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल.
Read More …

दिल्लीतील अण्णा हजारे आणि त्यांच्या सहका-यांचे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, तसेच ‘निर्भया’ प्रकरणाने देशभरात उसळलेली संतापाची लाट किती जोरदार आहे, याचा अंदाज सत्ताधारी वर्गाला आला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार आणि महिला अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. परिणामी लोकांमधील असंतोष वाढतच गेला. त्याच सुमारास महागाई आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे सर्वसामान्य माणूस परिस्थितीच्या चरकात पिळून निघत होता. त्याला आधार देण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. खासकरून जेव्हा अवघा महाराष्ट्र गारपिटीने कोलमडून पडला होता, त्या वेळी राज्याचे प्रशासन आचारसंहितेची कारणे दाखवून पाठ फिरवताना दिसले. एकूणच काय तर ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशा विचित्र स्थितीत लोक अडकले होते आणि त्याच वेळी त्यांच्या डोळय़ांसमोर भाजपने नरेंद्र मोदी आणि गुजरातच्या न झालेल्या विकासाचे ‘मॉडेल’ उभे केले. त्यामुळे साहजिकच दु:खाने पोळलेल्या मतदारांनी काँग्रेसपेक्षा भाजपचा पर्याय स्वीकारला.
Read More …

जगातील अवघी मानवजात नद्यानाल्यांच्या आश्रयाने राहिलेली आणि वाढलेली पाहायला मिळते. मानवी संस्कृतीमध्ये व्होल्गा ते गंगा हा जीवनप्रवास कशा पद्धतीने झाला, याचे अत्यंत सुरेख चित्रण राहुल सांकृत्यायन यांनी ‘व्होल्गा से गंगा’ या पुस्तकामध्ये केलेले आहे. त्या एकूण सांस्कृतिक प्रवाहामध्ये माणसे पाण्याच्या दिशेने कशी सरकत गेली आणि पाण्याबरोबर त्यांची जीवनगंगा कशी वाहत गेली, हे आपल्याला वाचायला आणि अनुभवायलाही मिळते. गेल्या अनेक शतकांपासून झालेला हा माणसांचा प्रवास, तो या गंगेच्या खो-यामध्ये आल्यानंतर स्थिरावलेला दिसतो, विशेषत: गंगेतील खो-यातील हा माणसांचा प्रवास जास्त करून काशीमध्ये आल्यानंतर गंगेबरोबर वसलेला आहे आणि त्या एकूणच मानवी जीवनाला गंगेने फक्त स्थिरता दिलेली नाही तर काशीच्या परिसरात तिला एक वेगळ्या प्रकारची संपन्नता आणि समृद्धता दिलेली दिसते. त्यामुळेच असेल कदाचित काशीतील गंगा आणि तेथील विश्वनाथ अवघ्या भारतवर्षासाठी पूजनीय बनले असावेत.
Read More …

आंबा हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करताना आंब्याची डहाळी दारावर लावून तयारी केली जाते. आंबा या फळाबद्दल आपल्या लोकांना इतके आकर्षण की आम्ही तो पिकण्याची वाटदेखील पाहत नाही. कै-या तोडणे हा प्रकार जगात तुम्हाला कुठे आढळणार नाही, भारतात मात्र कैरीचं लोणचं, पन्ह, आंबाडाळ असे एक ना अनेक प्रकार केले जातात आणि हापूससारखा आंबा तर सगळ्यांना खुणावतो, पण गावरान झाडावर पिकलेला मुठीएवढा आंबा खाणे हा तर वेगळाच आनंद. आजही अनेक घरात सर्वानी एकत्र बसून अमरसाचा आस्वाद घेणे ही पर्वणी असते. आंब्याचे एक वैशिष्टय़ ते म्हणजे, त्याचे चाहते समाजाच्या सर्व थरांत बघायला मिळतात. गरीब असो वा श्रीमंत सगळ्यांना या कोकणच्या राजाचे भलतेच आकर्षण. अवघ्या जगाला आपल्याकडे आकर्षित करणा-या या फळांच्या राजाला २८ देशांच्या युरोपीय संघाने दरवाजे बंद केले आहेत. आमच्या आमराजाची ही दयनीय स्थिती का झाली?
Read More …

भारतीय संस्कृतीमध्ये मातृऋण, पितृऋण आणि समाजऋण मानले जाते. पूर्वीच्या काळी हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला जात असे. हल्ली कोणालाच तसे करावेसे वाटत नाही. वृद्धाश्रम हा माता-पित्यांच्या उपकारातून मुक्त होण्याचा मार्ग आहे, असे समजणा-यांची संख्या जशी वाढत आहे, तशीच ‘फेसबुक’ वा ‘ट्विटर’वर ‘सापडणारा’ वर्ग म्हणजे समाज, असा गैरसमज दिवसेंदिवस दृढ होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कितीही निवडणुका आल्या आणि गेल्या तरी समाजातील दु:खी-पीडितांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी आपण समाजसेवेसाठी आयुष्य झोकून देणा-या आमटे कुटुंबीयांसारख्या मंडळींना साथ दिली पाहिजे. २८ एप्रिल ते दोन मे २०१४ या दरम्यान डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या अथक परिश्रमातून उभ्या राहिलेल्या ‘लोक बिरादरी प्रकल्पा’चे छायाचित्र-प्रदर्शन डोंबिवलीत भरणार आहे. श्रीगणेश मंदिर संस्थान येथे दररोज सकाळी १० ते  रात्रौ ९.३०पर्यंत हे प्रदर्शन खुले राहील. कुणी तरी नेता आपले आयुष्य बदलेल, अशा भ्रमात राहण्यापेक्षा स्वबळावर जग बदलणा-या आमटे कुटुंबीयांचे काम तमाम मुंबई-ठाणेकरांना या ठिकाणी पाहायला मिळेल. आपापल्या आर्थिक ताकदीनुसार त्या समाजसेवेच्या गोवर्धनाला हातभार लावता येईल. राजकारणाएवढीच आपण समाजकारणामध्येही रुची दाखवली तर देश नक्कीच बदलेल.
Read More …

सध्याचे दिवस व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीचे म्हणजे आभासी वास्तवाचे आहेत, पण आभास आणि वास्तव हे वेगवेगळे असते. टीव्ही, इंटरनेट आणि मोबाइल यांच्या माध्यमांतून भाजपचे नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल सर्वसामान्य लोकांसमोर ‘उज्ज्वल भविष्याचे’ जे चित्र रंगवत आहेत, ते आभासी आणि अतिरंजित आहे. यंदाच्या निवडणुकीत सहभागी होणा-या दहा कोटींहून अधिक तरुण, अननुभवी मतदारांना या भ्रमाच्या पायावर राजकारण करणा-या पक्षांच्या वास्तवाची वेळीच जाणीव करून द्यायला हवी, अन्यथा भ्रमजालाला भुलून तरुणाईचे हे हत्यार या पक्षांच्या हाती गेल्यास देशात अराजक माजेल. जगभरातील पुढारलेल्या देशांत सत्तेची सूत्रे तरुण लोकप्रतिनिधींच्या हाती येत आहेत. या परिस्थितीत आपल्याकडे लोकशाही दृढ व्हायची असेल तर आपल्या देशाचे ख-या अर्थाने वास्तववादी भवितव्य घडवू पाहणा-या राहुल गांधी यांच्यासारख्या युवा नेत्याची निवड करणे, हेच मतदार म्हणून परिपक्वतेचे आणि समजूतदारपणाचे ठरेल.
Read More …










Read More …


राजकारण हे अर्थकारणाच्या पायावर उभे असते. ज्या देशात अर्थकारण बिघडते त्या देशातील राजकारण आणि पर्यायाने समाजकारण अशुद्ध होते. हा सर्वसाधारण नियम आहे. गेल्या दोनेक वर्षात आपल्या अर्थक्षेत्रात धोकादायक पद्धतीने चढ-उतार येत आहेत. डॉलर्सच्या तुलनेत रुपया खाली जात आहे. शेअर बाजार वर उसळ्या मारीत आहे. आणि दुसरीकडे...
Read More …

गुढीपाडवा, म्हणजे आपला नववर्ष दिवस. हल्ली या दिवसाला शोभायात्रांमुळे अगदी उत्सवी स्वरूप आलेले दिसते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा या उत्सवाला जास्तच उधाण येईल, अशी चिन्हे दिसताहेत. आमचा दिग्विजयी राजा गौतमीपुत्र सातकर्णी याच्या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी १९३५ वर्षापासून आम्ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणारी कालगणना वापरत आहोत. श्रीशालिवाहन शक म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि मध्य प्रदेशातील लोकांमध्ये प्रसिद्ध असलेली ही कालगणना भारत सरकारने अधिकृतपणे भारतीय कॅलेंडर म्हणून मान्य केली आहे. एका पराक्रमी मराठी राजाच्या नावाचे जवळपास दोन हजार वर्षानंतरही होत असलेले स्मरण जेवढे आनंददायी, तेवढाच मराठी लोकांना आपल्या राजाचा पडलेला विसरही वेदनादायी वाटतो. गणपतीच्या मिरवणुकीत, नवरात्रातील दांडियात नाचणारी मराठी तरुणाई आता गुढीपाडव्याच्या शोभायात्रेतही तेच रंग उधळताना दिसते.. त्यांनी शिवरायांप्रमाणे, शालिवाहन राजाचेही रूप आठवून पाहावे..
Read More …

मराठी वृत्तपत्रांमध्ये दिल्लीतील राजकीय घडामोडींपासून साहित्यिक हालचालींपर्यंतच्या सर्व क्षेत्रांविषयी एक नवी जाणीव निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक जैन यांचे निधन ही त्यांच्या लिखाणावर प्रेम करणा-या प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी बातमी. विशेषत: सध्या ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल आणि कंपूने राजकीय धुमाकूळ घातलाय. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जे धूमशान रंगलंय अशा काळात तिरकस, बोचरे आणि परखड विश्लेषण करणारे अशोक जैन यांचे जाणे फारच दु:खद आणि क्लेशदायक. मराठी वृत्तपत्रसृष्टीला आपल्या ‘कलंदर’ वृत्तीने आत्मभान देणा-या जैन यांना दिल्लीतील राजकीय परीक्षणाएवढेच पुस्तक वा नाटय परीक्षणात रस होता. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणे त्यांना आवडायचे आणि साधायचेदेखील. ते शरद पवार यांच्याशी ज्या सहजपणे बोलायचे त्याच आत्मीयतेने त्यांचा कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्याशी संवाद चाले. खरे सांगायचे तर जैन यांना संवादाएवढेच वादही आवडायचे. फटकळपणाच्या जवळ जाणारा स्पष्टवक्तेपणा अंगी असल्यावर वादाचे वादळ उठणारच! जैन ते वादळ उठवायचे आणि त्यावर स्वारही व्हायचे. दिल्लीतील असाच एक किस्सा त्यांनी सांगितला होता. १९७८ ते १९८९ या काळात त्यांनी दिल्लीतील अनेक राजकीय घटनांवर भाष्य करणारे लेख लिहिले होते. त्या लेखांमुळे अनेक बडे राजकारणी त्यांच्यावर नाराज होते. तत्कालीन केंद्रीय नभोवाणीमंत्री वसंत साठे, हे त्या नाराजांपैकी एक. बराच काळ त्यांनी जैनांशी अबोला धरला होता. एकदा महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाला साठे यांना बोलावण्यात आले होते. त्या व्यासपीठावर जैनही होते. त्यावेळी साहित्य- संस्कृतीविषयक जैन यांनी असे काही भाषण केले की, साठे यांनी आपला राग विसरून त्यांना सर्वासमक्ष मिठी मारली आणि मोकळ्या मनाने उद्गारले, ‘अशोक, तुमच्या अवगुणांपेक्षा गुणच जास्त चांगले आहेत. मी उगाचच तुमच्याशी अबोला धरला.’ खळखळून हसत जैन यांनीही तो विषय तिथेच संपवला.

जैन हे उत्तम पत्रकार होते, त्यांचे राजकीय विश्लेषण अचूक असायचे. खोचक टीका करताना त्यांच्या लेखणीला अगणित मिच्र्या फुटायच्या. त्या इतक्या तिखट असायच्या की, ‘मधु’ मधाळ लेखकरावांच्या तोंडून शिवराळ जाळ निघायचा. राजकारण्यांच्या खुच्र्या हलायच्या. त्यामुळे ते सारे जैनांना ‘हलविण्यासाठी’ पुढे यायचे. पण मोकळ्या मनाचे जैन त्या प्रतिक्रियांमध्येही रमायचे. मुख्य म्हणजे आपल्यावर कोणी काय टीका केली, हे सांगून सहजपणे हसायचे. वर वर पाहताना ही गोष्ट साधी वाटते. पण ती खरे तर खूप कठीण गोष्ट आहे. स्वत:च्या दाढीपासून गाडीपर्यंत प्रत्येक विषयावर कोटी करणे, हा त्यांचा आवडता छंद. एकदा त्यांच्यासोबत फोर्टमधील पारशी पद्धतीच्या भोजनालयात गेलो होतो. सगळ्या हॉटेलात आम्हीच तेवढे मराठी होतो. बाकी सारे पारशीच दिसत होते. जैन त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वेटरला हाक मारते झाले, ‘अरे, इकडे ये’ आणि सारे लोक आमच्या दिशेने पाहू लागले. गंमत म्हणजे शेजारच्या टेबलावरील एका पारशी बावाजीने त्यांच्याकडे पाहून हात केला, जैनांनीही प्रतिसाद दिला. आणि पुढे सुरू झाला पारशी खाद्ययात्रेचा रसिला प्रवास. पारशी मटन धनसाक, पात्रानी मच्छी आणि झिंगानी खिचडीने पोट भरले. खमंण ना वडा आणि फालुदा कुल्फीने त्या चटकदार खाद्ययात्रेवर कळस चढवला. पण खरे सांगायचे तर त्या प्रत्येक पदार्थाबद्दल सांगताना जैन ज्या पद्धतीने माहिती देत होते, ते ऐकून मन तृप्त झाले होते. त्यामुळे न राहवून त्यांना विचारले, ‘तुम्हाला या पारशी पदार्थाबद्दल एवढी कशी माहिती, तुम्ही तर ‘जैन’ आहात ना?’ त्यावर गडगडाटी हास्य करत ते उत्तरले, ‘अरे माझे आडनाव जैन नव्हे, चैन असायला हवे होते!’

जैन यांचा पत्रकारितेतील प्रवास १९६१पासून पुण्यात बातमीदारीतील उमेदवारीने सुरू झाला आणि पुढे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या कार्यकारी संपादकपदापर्यंत ते पोहोचले होते. पण त्यांच्यातील ‘बातमीदार’ हा आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत सक्रिय होता. बातमी हा त्यांच्या कायम जिव्हाळ्याचा, औत्सुक्याचा, प्रेमाचा आणि आस्थेचा विषय होता. म्हणूनच दुस-या वृत्तपत्रातील बातमीदारांच्या चांगल्या बातम्यांचे कौतुक करण्यात ते नेहमी पुढे असत. मोकळेपणाने नवख्या बातमीदाराचे कौतुक करताना जैनसाहेब प्रेमाचे, मोलाचे सल्लेही देत. त्यामुळे त्या नवख्या पत्रकाराची उमेद वाढायची. जैनांचे समकालीन बडे पत्रकार जेव्हा कंपू निर्माण करून त्यातच रमलेले दिसत होते त्या काळात जैन आपल्या स्वभावानुसार ‘एकला चालो रे’च्या भूमिकेत दिसायचे. फक्त लिखाणातच नव्हे, तर खासगी गप्पांमध्येही त्यांना आपले खरे मत मांडणे आवडायचे. त्यामुळेच असेल कदाचित महत्त्वाच्या पदी बसण्याची पुरेपूर पात्रता अंगी असूनही हा स्पष्टवक्तेपणा आड येत असावा. तसा तो अनेकांना महागात पडला. राजकारणाचा अफाट व्यासंग, जबरदस्त जनसंपर्क आणि सुंदर लेखनशैली असूनही वरुणराज भिडे मागे पडतात. अर्थकारणापासून युद्धशास्त्र, क्रिकेटपासून वैद्यकशास्त्र आणि जीवनाच्या विविधांगांचा प्रचंड अभ्यास असूनही मिलिंद गाडगीळ मूळ प्रवाहापासून दूर फेकले जातात. अगदी जैन यांचेही तसेच घडले. हल्ली ज्याला ‘व्यावहारिक शहाणपण’ म्हणतात त्या तडजोडीच्या हुशारीला त्यांनी कधीच जवळ केले नाही. आपल्या लिखाणाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असल्यामुळे जैनांना ‘व्यावसायिक आखाडया’चे कधीच आकर्षण नव्हते. तो त्यांचा प्रांतही नव्हता. त्याचे परिणाम व्हायचे तेच झाले. पत्रकारितेत व्यावसायिक तणाव हे नेहमीच आरोग्य आणि कुटुंबावर जास्त आघात करतात. पण आघाताने डगमगतील ते जैन कुठले. पक्षाघाताला आपल्या विनोदाच्या बळावर आणि सुनीतीजींच्या साथीने त्यांनी अक्षरश: जिंकले होते. शारीरिक व्याधीला न घाबरता जैन यांनी सुप्रसिद्ध लेखकांच्या नामवंत पुस्तकांचे अनुवाद करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव (अंत:स्थ), माजी राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर (इंदिरा : अंतिम पर्व), आर. के. लक्ष्मण (लक्ष्मणरेषा), अरुण गांधी (कस्तुरबा) इत्यादी डझनावारी पुस्तके मराठीत आणून त्यांनी मराठी वाङ्मयाची फार मोठी सेवा केली. अगदी शेवटपर्यंत ते लिहीत राहिले आणि नव्या पत्रकार, संपादकांना हिताचे सल्ले देत राहिले. म्हणूनच जैन यांच्या जाण्याचे दु:ख वाटते.

जैन यांचा जन्म टिपिकल मारवाडी कुटुंबात झाला होता. पुण्याजवळील घोडेगाव हे त्यांचे मूळ गाव. ज्या काळात पुण्यात चार-सहा लोकांकडे मोटारी होत्या, त्यावेळी जैनांच्या आजोबांकडे मोटार होती. अशी त्यांच्या परिवाराची आठवण शरद पवार यांनी एका पत्रकारांच्या कार्यक्रमात सांगितली होती. एकूणच काय तर जैनांनी परंपरेने आलेले व्यावसायिक चातुर्य नाकारून शब्दांवर प्रेम करण्याचा वेडेपणा स्वीकारला. त्यामुळे मराठी पत्रकारितेला चांगल्या राजकीय बातम्या, विश्लेषण आणि बोचरे उपहासगर्भ लिखाण कसे करता येते, हे समजले. त्यांनी मराठीला ‘मौनी खासदार’, ‘चित्रपश्चिमा’सारखे अनेक नवे शब्द दिले. अनुवादाच्या कामाने मराठी भाषा समृद्ध केली, तरी त्यांच्या या कार्याची साहित्यविश्वाने म्हणावी तेवढी दखल घेतली नाही. अर्थात जैनांना त्याची अजिबात पर्वा नव्हती. एक मात्र खरे की, जैनांचे हे योगदान पत्रकार आणि पत्रकारितेचे विद्यार्थी तरी कायम स्मरणात ठेवतील.. तीच त्यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल!
Read More …

इतिहास हा माणसाला प्रेरणादायी असतो. त्यावर आबालवृद्ध पिढयान् पिढ्या प्रेम करत आलेले दिसतात. शेकडो, हजारो वर्षे होऊन गेलेल्या किंवा होऊन गेल्याची निव्वळ चर्चा असणा-या व्यक्ती, प्रतिमा आणि घटनांचा प्रभाव आपण आनंदाने जगतो. कदाचित त्याच प्रेमाच्या भावनेतून ‘इतिहासाची पुनरावृत्ती होतेच’ असा सार्वत्रिक समज उगम पावला असावा.. तर असा हा इतिहास भारतात लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम राष्ट्रप्रेमाशी जोडला. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजी सत्तेबरोबर लढताना समाजातील इस्लामी वर्चस्वाचा पगडा कमी करण्यासाठी लोकमान्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव ‘सार्वजनिक’ केले. एकीकडे बहुजनवर्गाला धर्मवादी करत असतानाच टिळकांनी समाजातील अभिजनांना पटवून देण्यासाठी ‘दि आर्टिक होम इन वेदाज’ या पुस्तकाच्या माध्यमातून आर्यवंशाचे मार्गक्रमण समजावून सांगितले. ते तेथेच थांबले नाहीत, त्यांनी ‘गीतारहस्य’ लिहून सुशिक्षित वर्गाच्या राष्ट्रप्रेमाला धार्मिक अधिष्ठान दिले. परिणामी तिकडे युरोपात त्याच काळात नवमतवादी बुद्धिमंत धर्माचे वर्चस्व मोडून काढत होते आणि मानवाधिष्ठित समाजमूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी लढाई लढत होते, त्या काळात आम्ही भारतीय मात्र इतिहासाच्या भूतकाळाच्या जंजाळात शिरत होतो. भारतीय राष्ट्रीयत्वाची हाक देणा-या टिळकांच्या नेतृत्वाखाली तमाम भारत धर्म, वंश आणि परंपरांचा अभिमान शिकवणा-या इतिहासाच्या जाळ्यातून अद्याप बाहेर आलेला नाही. आता तर नरेंद्र मोदी आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर करून ते इतिहासाचे जाळे अधिक व्यापक बनवित आहेत, ही गोष्ट भारतीय लोकशाहीसाठी घातक आहे. पुढच्या दिशेने केलेला प्रवास आम्हाला धोक्याच्या वळणावर नेणारा असेल, पण लक्षात घेतो कोण?
Read More …

कोणे एकेकाळी संगणक क्षेत्रातील मक्तेदारी मिरवणा-या ‘मायक्रोसॉफ्ट’ या अतिबलाढय़ कंपनीने आता संकटकालीन बचावाचा मार्ग म्हणून सत्या नडेला या ४६ वर्षीय भारतीय अभियंत्याकडे सूत्रे दिली आहेत. सत्याऐवजी फोर्ड मोटर कंपनीचा सीईओ अ‍ॅलन मुलाली किंवा एरिकस्नचा सीईओ हॅन्स वेस्टरबर्ग यांची तिथे नेमणूक होऊ शकली असती, पण माहिती-तंत्रज्ञानातील प्रावीण्यामुळे सत्याने बाजी मारली. त्याच्या या यशामुळे भारतातील लोकांनी जो जल्लोष केला, तो मन थक्क करणारा होता. कदाचित हल्ली आपल्या लोकांना कोणताही प्रसंग ‘साजरा’, ‘सेलिब्रेट’ करण्याची सवय जडली असावी.. त्यातही सत्याला दरमहा ९-१० कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ पगार म्हणून मिळणार आहे, म्हणून आमच्या मध्यमवर्गीयांना खास आनंद, पण खरा प्रश्न आहे पगारात आनंद मानण्याच्या, आयुष्यात जोखीम किंवा जबाबदारी न घेण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचा. सत्याच्या पगाराला भुलणा-या आमच्या मंडळींनी बिल गेट्सच्या कार्यकुशलतेचा आणि जोखीम काम करण्याच्या उद्योजकतेचा हेवा करायला सुरुवात केली पाहिजे..
Read More …

पुणे हे भन्नाट शहर आहे आणि पुणेकर हा एकदम वेगळा प्राणी आहे. हे शहर गणपतीच्या अकरा दिवसांत ज्या श्रद्धेने जागते, त्याच श्रद्धेने ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त दाद द्यायला हजर असते. पंढरपूरच्या वारीला सामोरा जाणारा पुणेकर ‘वसंत व्याख्यानमाले’ची वारीही कधी चुकवत नाही. महाराष्ट्राला विवेकनिष्ठेचे धडे आगरकरांच्या माध्यमातून पुण्यानेच दिले. पुढे डॉ. श्रीराम लागू-डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी हा विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचा लढा पुण्यातूनच चालवला. पुण्याने देशाला स्वातंत्र्याची दिशा दिली. सामाजिक विचार आणि शैक्षणिक प्रगतीचा मार्ग दाखवला. संशोधन आणि विज्ञानाची, उद्योग आणि आधुनिक ज्ञानाची पुण्याने कायम कास धरली. मुख्य म्हणजे आर्थिक आणि भौतिक प्रगती करताना पुणेकरांनी आपले सामाजिक उत्तरदायित्व मनोमन जपले. त्यांच्या त्या प्रामाणिक समाजभानाने पुण्यातील नेत्यांना देशपातळीवर नेले, पण आता ही सारी प्रक्रिया खंडित होत चालली आहे. आधीचे पुणे आता राहिले नाही. पूर्वी चिखलात कमळ उगवायचे. हल्ली कमळात चिखल भरलेला दिसतो. आणि म्हणूनच जेव्हा पद्मपुरस्कारांच्या यादीवर पुणेकरांची छाप दिसते, तेव्हा आनंद व दु:खाच्या समिश्र भावनेने मन भरून जाते आणि डोळ्यासमोर येते गझलकार दुष्यंत कुमार यांची तेजतर्रार कविता.

कैसे मंजर सामने आने लगे हैं
गाते-गाते लोग चिल्लाने लगे हैं
अब तो इस तालाब का पानी बदल दो
ये कँवल के फूल कुम्हलाने लगे हैं


पुणेरी लग्नपत्रिकेवरील अगदी ताजी टीप : (वधू-वरांस आहेर देताना पाकिटात २००५ पूर्वीच्या नोटा भरू नयेत ही विनंती)

Read More …

आपल्या जिवंतपणी आख्यायिका बनण्याचे भाग्य लाभलेले खुशवंत सिंग वयाच्या शंभरीत पदार्पण करीत आहेत, ही खरोखरच ‘खुशखबर’ आहे. सुप्रसिद्ध संपादक, सातत्यपूर्ण लिखाण करणारे स्तंभलेखक, इतिहासतज्ज्ञ आणि प्रकांड पंडित म्हणून ते ओळखले जातातच, पण त्याहीपेक्षा त्यांची जास्त प्रसिद्धी झाली, त्यांच्या बिनधास्त वागण्या-लिहिण्याने. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांना आपल्या लेखणीचा ‘प्रसाद’ देण्याची संधी लाभलेले जे काही मोजके संपादक सध्या हयात आहेत, त्यात खुशवंत सिंग यांचे नाव अग्रगण्य ठरते आणि म्हणूनच या शंभरीत पदार्पण करणा-या ‘तरुण, तडफदार’ संपादक-पत्रकाराला मानाचा मुजरा करणेही औचित्यपूर्ण वाटते.

सध्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरणात प्रचंड गोंधळ आणि अनागोंदी माजलेली दिसतेय. एखाद्या विषयावर सखोल अभ्यासपूर्ण, सडेतोड विचार व्यक्त करण्याची भारतीय परंपरा जवळजवळ लुप्त होत चालली आहे. ज्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, त्यांच्याकडे आपल्या विचारांचा उच्चार करण्याचे धैर्य नाही आणि ज्यांच्याकडे उच्चार करण्याचे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे विचार करण्याची कुवत नाही, अशी शोचनीय स्थिती सर्वत्र बनलेली दिसतेय. त्यामुळे कधी ‘बाल साहित्य’ हिंसक आंदोलनाला प्रेरणा देताना दिसते तर कधी ‘कुमार वाङ्मय’ तत्त्वचिंतकाचा आव आणत नीतीबाह्य गोष्टींना भाव मिळवून देताना दिसते. सरदार खुशवंत सिंग यांनी उभ्या आयुष्यात कधी असा भंपकपणा केला नाही. जे काही केले ते खुलेआम आणि बिनधास्त केले. त्यांच्या त्या मनस्वीपणाला मन:पूर्वक सलाम.

खुशवंत सिंग यांचा जन्म फाळणीपूर्व काळात एका धनाढय़ परिवारात झाला. त्यांचे वडील सरदार शोभा सिंग हे मोठे बिल्डर होते. ज्या पाच प्रमुख लोकांनी नवी दिल्लीला आकार दिला, त्यापैकी ते एक. लंडनच्या किंग्ज कॉलेजात कायद्याचे शिक्षण घेऊन आपला मुलगाही मोठा वकील व्हावा, असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण लंडनहून परतलेले खुशवंत सिंग बहुतांश वेळ आपल्या लाहोरमधील लेखक-पत्रकार मित्रांमध्येच व्यतीत करायचे. फाळणीनंतर त्यांचे सारे कुटुंब भारतात आले आणि खुशवंत सिंग यांची साहित्य लेखनाशी नाळ अधिक घट्ट झाली. त्याच दरम्यान फाळणीच्या ताज्या अनुभवावर आधारित ‘मानो माजरा’ गावावरील कहाणी लिहिली. त्यांच्या त्या लिखाणाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून दाद मिळाली. पुढे तिच कहाणी ‘ट्रेन टू पाकिस्तान’च्या रूपात १९५६मध्ये प्रसिद्ध झाली आणि खुशवंत सिंग लेखक म्हणून प्रस्थापित झाले. पुढे त्यांनी पत्रकारितेचा रस्ता पकडला आणि त्यांच्या धाडसी स्वभावाला व्यापक व्यासपीठ मिळाले. ‘दि इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी संपादक म्हणून सूत्रे स्वीकारली त्या वेळी त्या साप्ताहिकाचा खप होता एक लाख. पण, वर्षभरात वेगवेगळ्या शक्कली लढवून त्यांनी तो खप चार लाखांवर नेला आणि देशात अक्षरश: हंगामा केला. ‘टाइम्स’ वृत्तसमूहात काम करताना त्यांनी उत्तम पत्रकारांच्या अनेक पिढय़ा घडवल्या. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेल्या एम. जे. अकबर, बाची करकरिया, बिक्रम वोहरा, जे. आय. एस. कालरा यासारख्या संपादकांनी १९८०-९०नंतरच्या भारतीय पत्रकारितेला दिशा दिली.

खुशवंत सिंग यांनी ‘ए हिस्ट्री ऑफ सिख्स’ लिहिताना जे गांभीर्य दाखवले तेवढीच रसिकता ओतून ‘सेक्स, स्कॉच अ‍ॅण्ड स्कॉलरशिप’ लिहिले. गांधी घराण्याशी त्यांचा खूप घरोबा होता. पण तरीही आणीबाणी विरोधात खुशवंत सिंग उभे राहिले. भिंद्रनवालेंचा दहशतवाद टोकाला पोहोचला होता, त्या वेळीही ते निर्भीडपणे त्यांच्या विरोधात लिहीत होते. एकूणच काय तर या ‘रगेल’ आणि ‘रंगेल’ माणसाने आयुष्यात जे काही केले ते अगदी मन लावून केले. कशाचीही भिडभाड न ठेवता खुशवंत सिंग मनातील भाव व्यक्त करत राहिले. मजा, मस्ती, मदिरेचा धुंद आनंद घेत जगले आणि चक्क शंभरीपर्यंत पोहोचले. म्हणून या ‘बाप’ संपादकाला प्रणाम!
Read More …

दिल्ली हे आपले राजधानीचे शहर, तब्बल आठशे र्वष भारतासारख्या विस्तीर्ण देशाच्या राजकारणाची सूत्रे या शहरातून हलत आहेत. हे शहर पॅरिससारखे रंगेल नाही की, वॉशिंग्टनसारखे रगेल नाही. या शहराला लंडनसारखी ऐट नाही की मॉस्कोसारखी भीतीची छाया नाही, पण तरीही दिल्ली मोहक आहे. आकर्षक आहे. तिच्या अफाट आकर्षणाने जसे अनेक आक्रमक ओढवून घेतले, त्याचप्रमाणे तिच्या प्रेमात आकंठ बुडालेले राज्यकर्तेही तिने ‘एन्जॉय’ केले. अनियंत्रित, सुल्तान, बेफाम राजे, मोगल शहेनशहा आणि ब्रिटिशांच्या ‘साहेबी’ तंत्रामधून सावरत दिल्ली आज लोकशाहीच्या ‘झाडाखाली’ उभी आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांमध्ये या शहराने अनंत अनुभव घेतले. सर्व प्रकारचे सत्ताधीश सहन केले. जे पटले नाहीत त्यांचे निर्घृणपणे दमन केले. देशाच्या राजकारणात नवमन्वंतर घडविणारा अरविंद केजरीवाल नामक नवा आशेचा किरणही दिल्लीनेच दिला, पण त्या ‘किरणाने’ दिल्लीच्या रस्त्यावर ‘अविनय कायदेभंग’ करून स्वत:चे ‘रंग’ दाखवून दिले आहेत. ‘आप’ल्याला हृदयात स्थान देणा-या दिल्लीवर केजरीवाल यांनी सलग दोन दिवस राजकीय बलात्कार केला आहे. त्याची शिक्षा त्यांना जरूर मिळेल. लोकांनी पाठ फिरवल्यावर अण्णा हजारे यांचे आंदोलन जसे भुईसपाट झाले होते. तीच गत अरविंद ‘केरसुणीवाल’ यांची होईल.
Read More …

कवी, लेखक किंवा अन्य कोणताही कलावंत जेव्हा ‘व्यक्त’ होतो, तेव्हा त्याच्या त्या अभिव्यक्तीमागे असंख्य प्रेरणा असतात. त्यातील ब-याच प्रेरणा खुद्द कवी वा कलावंताला पण अनोळखी असतात. त्यामुळे जेव्हा एखादा समीक्षक कवितेची वा चित्राची समीक्षा करतो तेव्हा तो हमखास चुकीच्या निष्कर्षावर काथ्याकूट करत बसतो. नामदेव ढसाळ या महाकवीच्या कवितांनी तर मराठीतील मर्यादित भावविश्वाला गावकुसाबाहेरील अफाट अवकाशाचे ज्ञान करून दिले होते. त्यामुळे त्यांच्या कवितांनी मध्यमवर्गीय मराठी वाचक-समीक्षकांचे डोळे विस्फारले गेले. ढसाळांच्या आक्रमक भाषाशैलीने, नव्या प्रतिमा चिन्हांनी समीक्षक नामक प्राणी सैरावरा पळून गेले. त्यामुळे ढसाळांना काही फार फरक पडला नाही. मराठी भाषेचे मात्र अतोनात नुकसान झाले. ऑस्वॉर्न या सौंदर्यशास्त्रावर अधिकारवाणीने लिहिणा-या तज्ज्ञाने एका ठिकाणी ‘कलाकृती हा एक सजीवबंध असतो’ असे म्हटले होते, उदाहरणच द्यायचे तर ढसाळांची कविता पाहू. त्यांच्या प्रत्येक कवितेचा पोत इतका घट्ट असतो की, त्यातून एक शब्दही तुम्हाला काढता येत नाही किंवा त्याला तुमचे ठिगळही लावता येत नाही; कारण त्यांच्या कवितेत सजीवबंध रसरसून भरलेला होता. भृतृहारी, जो रसिक होता, कवी, राजा, विचारवंत, तत्त्वज्ञही होता. तो एके ठिकाणी म्हणतो, ‘ज्याच्या कवितेत रस आहे, त्या कवीला म्हातारपण आणि मृत्यूचे भय नसते.. तो कवी अमर असतो.
Read More …

गुजराती लोकांचे खाण्यावर विलक्षण प्रेम. ते जेवढे प्रेम पैशावर करतात, तेवढेच खाण्यापिण्यावर, त्यामुळे गुजरातीत उजव्या हाताला, उजवा म्हणण्याऐवजी ‘जमणा हात’ म्हणजे ‘खाण्यासाठीचा हात’ म्हटले जाते. तर अशा या खाद्यप्रेमी गुजराती समाजाची सुरतेवर खूप माया आहे; कारण सुरती फरसाण, पेढा, बर्फी आणि सुरती उंधियूने गुजराती समाजाचे पिढयान् पिढ्या पोषण केले. इतिहासकाळापासून समृद्ध बाजारपेठेमुळे सुरती लोक छानछोकी आणि खाण्यापिण्याचे शौकिन बनले नसते तरच नवल, तर अशा लोकांना गुजरातेत ‘सुरती लाला’ म्हणण्याची प्रथा आहे. आणि त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी तर पिढ्यान् पिढ्या म्हणी, वाक्यांमधून अजरामर झालेल्या दिसतात. त्यामधूनच ‘सुरतमा जमण अने काशीमा मरण’ म्हणजे जेवायचे असेल तर सुरतेत आणि मरायचे असेल तर काशीत, अशी म्हणही प्रचलित झालेली दिसते, तर अशा या गुजराती समाजाच्या आवडीचा विषय असणा-या सुरतेचा इतिहास शिवाजी महाराजांच्या दोन स्वा-यांनी बदलला. त्यानंतर सुरत बदसुरत झाली आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनत गेली.. मोदींनी रायगडावर येऊन मराठ्यांचा वेगळा इतिहास मांडण्याची चूक केली, म्हणून पुन्हा एकदा सुरतेवर प्रकाशझोत टाकणे भाग पडले.
Read More …


मराठीपुढे नवतंत्रज्ञानाधारित इंग्रजीने मोठे आव्हान उभे केले आहे. त्याला तोंड देण्यासाठी जर साहित्यिक वा राजकीय नेते पुढे येत नसतील, तर मावळ्यांच्या निष्ठेने तुम्ही-आम्ही सर्वांनी छातीचा कोट करून मन:पूर्वक मराठी जपली पाहिजे…
Read More …